रेल्वेत चोरीच्या घटनांमध्ये वाढ   

वर्षभरात १ हजार ६९४ गुन्ह्यांची नोंद

पुणे : राज्यासह देशातील महत्त्वाचे रेल्वे स्थानक म्हणून पुणे रेल्वे स्थानकाची ओळख आहे. त्यामुळे येथून ये-जा करणार्‍या प्रवाशांची संख्याही लक्षणीय आहे. मात्र, प्रवाशांच्या गर्दीचा फायदा घेत चोरटे चोर्‍या करतात. परिणामी मागील वर्षीच्या तुलनेत यंदा स्थानकावरील चोर्‍यांच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. 
 
एप्रिल २०२४ ते मार्च २०२५ या काळात एक हजार ६९४ गुन्हे नोंद झाले आहेत. विविध प्रकारच्या गुन्ह्यात एक हजार ८६९ जणांना अटक करण्यात आली आहे. मागील वर्षाच्या तुलनेने चोरीच्या घटनांत वाढ झाली आहे. कमी तिकीट सुरक्षित प्रवासाला प्रवासी प्राधान्य देतात. त्यामुळे पुण्यातून धावणार्‍या रेल्वे गाड्यांना कायम गर्दी असते. तसेच रेल्वेचा प्रवास सोयीचे असल्याने सर्वसामान्यांपासून उच्चभ्रूपर्यंत सर्वच जण प्रवासासाठी रेल्वेला प्राधान्य देतात. याच गर्दीचा फायदा घेत चोरटे प्रवाशांचे पैसे, साहित्य, दागिण्यांची चोरी करत असतात. त्याचा फोटा आर्थिक फटका प्रवाशांना बसत असतो.  
 
२०२३-२४ मध्ये मध्य रेल्वे एक हजार १४६ गुन्हे नोंद झाले असून, एक हजार २६४ जणांना अटक करण्यात आले होते. मागील आर्थिक वर्षाच्या यंदा ५४८ गुन्ह्यांमध्ये वाढ झाली आहे. त्यामुळे महिला, ज्येष्ठ आणि लहान मुले यांना चोरट्यांच्या दहशतीत रेल्वेतून प्रवास करावा लागत आहे. आरपीएफ, रेल्वे पोलिसांनी चोरट्यांवर कारवाईचा बडगा उगारला तरी चोरीच्या घटनांमध्ये वाढ होत आहेत. यामुळे प्रवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.
 
दरोड्याच्या घटनांमध्ये घट 
 
चोरटे हातसफाई करण्यासाठी काही वेळा रेल्वेवर दरोडा टाकतात. २०२३-२४ मध्ये मध्य रेल्वेत ४३ दरोड्यांच्या घटनांची नोंद करण्यात आली आहे. तर २०२४-२५ मध्ये केवळ १६ घटना घडल्या आहेत. यावरून दरोड्याच्या घटना मोठ्या प्रमाणात कमी झाल्या आहेत, ही सकारात्मक बाब आहे. आरपीएफ, रेल्वे पोलिस यांच्या कडक निगराणीमुळे यामध्ये घट झाली आहे; परंतु हातसफाई वाढल्यामुळे प्रवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला आहे.
 
पुणे विभागात घडलेल्या चोरीच्या घटना 
 
   वर्ष              चोरी घटना अटक
२०२४-२५           ११४५               १२६४
२०२४-२५         १६९४               १८६९

Related Articles